श्री देव जैतीर उत्सव
Автор: SWARNIM KOKAN _ स्वर्णिम कोकण
Загружено: 2024-06-08
Просмотров: 22249
Описание:
श्री देव जैतीर उत्सव २०२४🙏🏻🚩🌷
कोकणचं वैभव हे तेथील निसर्गासोबत गावातील मंदिरे, रुढीचार,धार्मिक,भक्तिमय सोहळे यामुळे सुद्धा अधिक खुलून दिसते. ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने दैवी शक्तीने घडून येणारे भक्तिमय सोहळे सुद्धा पाहण्याजोगे असतात. कोकणात खासकरून या देवतांची धार्मिक कामे अतिशय भक्तिमय वातावरणात आजही पूर्वजांनी आखून दिलेल्या रुढीचारा प्रमाणे होताना आपल्याला दिसून येतात. असाच एक सोहळा, आमच्या वेंगुर्ला तुळस गावची ग्रामदेवता जैतीर च्या उत्सव रुपी परंपरेतील पूर्वांपार चालत आलेला अनोखा "जैतीर" उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात साजरा झाला. तुळास गावच्या गावऱ्हाटीतील अनोखा सोहळाच, ढोल ताशाच्या लयबद्द वादनाबरोबरच सनई चौघड्यांची धून सुद्धा उत्सवाची रंगत अधिकच वाढते. त्यातीलच एक देव देवतांच्या रुपात होत असलेला छोटासा क्षण टिपण्याचा केलेला प्रयत्न.
रयतेचा राजा....श्री जैतिर...!!
नराचा नारायण झालेली उदाहरणे अनेक आहेत. तो एक अत्यंत लढवय्या वीर. स्वत:कडील तळपत्या तलवारीनं अन्यायाविरोधात दोन हात करताना पराक्रमाची गाथा रचणारा हा शूरवीर! लोकांसाठी तो ‘जैतोबा’ होता. सावंतवाडी संस्थानच्या बांदेकोट आणि हनुमंतगड या दोन किल्ल्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्यातील दैवी शक्तीचा अनुभव वेळोवेळी लोकांना यायचा. त्यावेळीही जैतोबा आपल्या भक्तांसाठी जनतेसाठी अविरत त्यांच्या पाठिमागे राहिले, अन् आजही तेच ‘जैतोबा’ भक्तांच्या गळ्यातील ताइत बनले. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस आणि नारूर या दोन गावांचे ऋणानुबंध जपणारा हा उत्सव. आज त्यांच्या श्रद्धेची धार तळपणार्या तलवारी इतकी प्रखर आहे. दोन गावांचे एका अद्भुत घटनेनंतर दैवत बनलेले ‘जैतोबा’ अर्थात ‘जैते परब’ हे महाराष्ट्रातील असे एकमेव देवस्थान, ज्याच्या पावन खिंडीतून निघताना भक्तांच्या पाठीवर संरक्षणाची, कृपेची ‘ढाल’ असते. आणि धन्य त्या ‘जैतोबांची कन्या’ जिला असा दिव्य पित्याचा सहवास लाभला. अशा या तेजस्वी, दैवी पुरूषाला साष्टांग दंडवत!
तुळस एक समृद्ध संपन्न असा गाव. तेथील जैते परब. हा लढवय्या असा शूरवीर. त्यांना एकुलती एक मुलगी, ती वरघाटीला अर्थात कोल्हापूर संस्थानातील पाडगावच्या बाजूला लग्न करून दिलेली. आपल्या मुलीस माहेरी आणावं या हेतूनं ते तिच्या घरी गेलेले. त्यावेळी कुळंबिण नसल्यामुळं सासरच्यांनी बापाबरोबर तिला एकटी पाठविण्यास नकार दिला होता. त्यानंतर ते तुळस गावी आले. बरोबर नागल आणि कुळंबिण यांना सोबत घेतलं, अन् ते पुन्हा निघाले. त्यावेळी असं म्हणतात, की वाटेत भिल्लांनी त्यांना अडविले. कुळंबिण आणि तिच्या अंगावरील दागिने, याला कारणीभूत असेल. आणि रांगणागडाचा तो मार्ग असेल. या तिघांचा बचाव करण्यासाठी जैते परब भिल्लांच्या अंगावर भिडले. अत्यंत शूर अशी ख्याती असलेल्या जैते परबांनी त्यातील काही भिल्लांना कंठस्नान घातले. परंतु भिल्ल झाडांआड लपून बाणाने वार करीत असल्याने त्यातील एक बाण कुळंबिणीला लागला व ती तेथे मरण पावली. एक बाण जैतै परब यांच्या डोक्याला लागला. त्यावेळी जैते परब अस्वस्थ असल्याची जाणीव होताच, भिल्लांनी दागिने घेऊन पोबारा केला. नागलने डोक्याला पट्टी बांधली. त्यानंतर ते कसेबसे नारूर गावात आले, अन् तेथे सुद्रीक यांच्या घरातील एका महिलेने त्यांना पाणी दिले. पण त्याचवेळी त्यांचे देहावसान झाले. तेच जैते परब आता संचार स्वरूपात सुद्रिकांच्या घरातील व्यक्तीवर अवतरतात. त्यानंतर त्यांना तुळस गावी आणण्यात आलं, स्वत:च्या मुलीवर जीवापाड प्रेम करणारा एक वीर, असा दैवी स्वरूपात सर्वांमध्ये सामावून गेलाय. म्हणूनच माहेरवाशिण आणि प्रामुख्याने महिलांच्या नवसाला पावणारं हे दैवत म्हणून ओळखलं जातं. ज्यावेळी जैते परब यांना तुळस गावात आणण्यात आलं, त्यावेळी त्यांची पत्नीही त्यांच्याबरोबर सती गेली, असे जाणकार सांगतात. म्हणूनच तर जैतिर उत्सवात शेवटच्या दिवशी परब घराण्यातील सुवासिनी चक्क पेटते निखारे डोक्यावर घेतात. याला इथे ‘इंगळे न्हाणे’ म्हणतात. कालांतराने ही केवळ प्रथा पडली असली तरीही, याचा संबंध त्या पूर्वीच्या घटनेशी नक्कीच असेल.
खापरा उत्सव हा दोन वर्षांनी एकदा साजरा होतो. या उत्सवाला भाविकांची मांदियाळी असते. हातात तलवार, डोक्यावर लाकडी रूपडे, फुलांचे हार घातले जातात. तलवारीचा वार ढालीवर झेलला जातो. या कार्यक्रमानंतर नारूर सीमेबाहेर जावून नैवेद्य दाखविला जातो. नैवेद्य दाखवून गार्हाणे केल्यानंतर जैतिर, तुळस येथील कार्यक्रम सुरू होतो.
तुळसमध्ये ११ दिवस हा उत्सव चालतो. पहिल्या दिवशी जैतिराचा मुखवडा हा देवघरातून मंदिराच्या मांडावर आणला जातो. प्रत्येक घराला जैतिर भेट देतो, अन् आशीर्वचन देतो. दशमीच्या दिवशी जोगिणीचा कार्यक्रम असतो. भोगिनी कार्याच्या दिवशी रात्री सर्व भाविक एकत्र जमतात. श्रीफळ वाढवून देवाला मुजरा देतात. जैतिराची तुळस गावावर जशी कृपादृष्टी, तशीच नारूर गावावरही आहे. कारण हा एक सरसेनापती आहे. प्रचंड आत्मिक शक्ती आणि बलाढ्य जिद्द असलेल्या एका दैवी पुरूषाची ही अगाध लिला आजही भक्त तितक्याच आत्मियतेने अनुभवतात. या दोन्ही गावातील लोकांची सोयरीक होत नाही. शिवाय जास्त काळ तिथं थांबत नाहीत. एक प्रथा, परंपरा म्हणून याकडे पाहतानाही भाविकांनी एका शूर योद्ध्याला आणि लेकराची आस असलेल्या एका पित्याचा खर्या अर्थाने गौरव केला आहे. ‘जैतिर’ हे नाव उच्चारल्याबरोबर अंगावर शहारे येतात. आजही या उत्सवात त्याचा संचार अनुभवताना एका दिव्यानुभवाची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. ११ दिवसांच्या उत्सवाची सांगता ‘कवळास’ उत्सवाने होते. त्यामुळे एकदा तुम्ही दोन्ही गावांतील हा अगम्य असा सोहळा नक्की अनुभवा! कोकणच्या मातीत जसे नवपेरणीची पालवी डोलायला लागते, तसा भक्तीचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो. पुढील महिन्यात हा उत्सव होतोय, त्यामुळे अवश्य या.... संकटी धावणारा... हाकेला ओ देणारा, आणि भक्तीला जागणारा असा श्री देव जैतीर....
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: